नवी दिल्ली : राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. बुधवारी राजस्थानातील 10 शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे होते. देशातील सर्वात उष्ण शहर राजस्थानमधील बाडमेरच ठरले.
बाडमेरला कमाल 48 अंश तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत राजस्थानचे तापमान 50 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीरमध्येही उकाडा असह्य होता. राज्यातील दहा शहरांमध्ये (बाडमेर, फलोदी, चुरू, गंगानगर, जोधपूर, बिकानेर, कोटा, चित्तोडगड, पिलानी, भीलवाडा) बुधवारी तापमान 45 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.
पुणे : मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यानुसार बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (24 मे) तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचे रूपांतर शनिवारी (25 मे) चक्रीवादळात तर 26 मे रोजी त्याचे रूपांतर महाचक्रीवादळात होणार आहे. हे महाचक्रीवादळ पुढे बांगला देश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.