IAF AN-32 Crash: आसाममधील जोरहाट येथील भारतीय वायुसेनेच्या रोरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. लँडिंगदरम्यान भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहू विमान कोसळल्याने पायलटसह पाच जवानांचा मृत्यू झाला. या अपघातात को-पायलटलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हे विमान उड्डाण पूर्ण करून एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लँडिंगच्या अंतिम टप्प्यात अचानक विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणांतच ते दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले.
या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतीय वायुसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, हे AN-32 विमान नियमित उड्डाणावर होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणतेही अंदाज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वायुसेनेकडून करण्यात आले आहे.
दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश देण्यात आले आहेत. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कोणते कारण या दुर्घटनेमागे आहे का, याचा तपास केला जाणार आहे.
AN-32 हे भारतीय वायुसेनेचे महत्त्वाचे वाहतूक विमान मानले जाते. सैनिक, लष्करी साहित्य आणि आवश्यक पुरवठा दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेष म्हणजे हिमालयीन भाग आणि उष्ण हवामानातही हे विमान प्रभावीपणे काम करू शकते.
भारतीय वायुसेनेकडे सध्या अशा 100 AN-32 विमानांचा ताफा आहे. 1980 पासून हे विमान वायुसेनेच्या वाहतूक क्षमतेचा कणा मानले जाते. त्यामुळे या दुर्घटनेने संरक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त जवानांना विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.