गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा 
राष्ट्रीय

गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.16) दिल्लीत मणिपूरमधील जातीय संघर्षाच्या दरम्यान सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात यावेत, अशा सुचना गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या. तत्पूर्वी रविवारी, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट घेतली होती.

मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी मेईतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी या समुदायाने मागणी केली होती. या मागणीला स्थानिक लोकांकडून विरोध झाला. त्यानंतर जातीय हिंसाचाराचा भडका उडाला. तेव्हापासून, चालू असलेल्या संघर्षात कुकी आणि मेईतेई या दोन्ही समुदायातील 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. मणिपूरमध्ये एकुण राज्याच्या लोकसंख्येपैकी 53% मेईतेई समुदायाचे लोक आहेत. ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर नागा आणि कुकींसह आदिवासी लोकांची संख्या 40% असून ते प्रामुख्याने डोंगराळ भागात राहतात. त्यामुळे हा संघर्ष कुठेतरी थांबावा आणि यामधून लोकांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. या पार्श्वभुमीवर ही बैठक पार पडली.

गृहमंत्री अमित शाह यांच्या आढावा बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला तसेच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जनरल उपेंद्र द्विवेदी, गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह, आसाम रायफल्सचे महासंचालक प्रदीप चंद्रन नायर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT