राष्ट्रीय

Almatti Dam : महाराष्ट्रात मुसळधार! अलमट्टीत 55.53 टक्के पाणीसाठा, जलाशयातील आवक वाढली; 70 हजार क्युसेक विसर्ग सुरू

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम असून कोयना, नवजा, महाबळेश्वर, राधानगरी, दूधगंगा, वारणा आणि इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अलमट्टी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत गुरुवारी (दि. 19) 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात आला आहे. 30 जूनपर्यंत जलाशयात 50 टक्केच पाणीसाठा करावा, अशी विनंती महाराष्ट्राने केली असली तरी सध्या 55.53 टक्के पाणीसाठा करण्यात आला आहे.

अलमट्टी जलाशयात गुरुवारी सकाळी 50 हजार क्युसेक इतका असलेला विसर्ग संध्याकाळी 7 वाजता 70 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम असून कोयना, नवजा, महाबळेश्वर, राधानगरी, दूधगंगा, वारणा आणि इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे कल्लोळ बॅरेजकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग वाढविण्यात आला आहे.

519.60 मीटर इतक्या कमाल उंचीच्या जलाशयात सध्या 515.55 मीटरपर्यंत पाणी साठवले गेले आहे. सध्या जलाशयात एकूण 68.343 टीएमसी पाणीसाठा असून ते 55.53 टक्केपर्यंत भरले आहे. संध्याकाळपर्यंत जलाशयात 78,250 क्युसेक इतकी पाण्याची आवक होती. पाण्याची आवक अधिक झाल्यास विसर्ग अजून वाढवण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

जून महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक झाल्याने जलाशय 55 टक्के भरलेले असले तरीही संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. जुलैपासून जलाशय पूर्ण भरण्यासाठी पावले उचलली जातील. सध्या पुराचा धोका लक्षात घेऊन विसर्ग वाढवण्यात आला आहे, असे केबीजेएनएलचे अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT