नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान 47.6 अंश होते. 17 मे रोजी 46.4 अंश, 18 रोजी 47.6 अंश, 19 रोजी 48.2 अंश व 20 मे रोजी 48 अंश होते. हवामान विभागाचा अंदाज आहे की, पुढील एक आठवडा महाराष्ट्रासह 8 राज्यांत तीव्र उष्माघातापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि राजस्थानसह 11 राज्यांसाठी आठवड्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. दरम्यान, गोंदियामध्ये उष्माघाताने एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ज्येष्ठ महिन्याच्या या भीषण उकाड्यापासून सध्या दिलासा मिळण्याची शक्यता नाही; पण यावेळी सर्वात मोठा धोका हा आहे की, दिवसाच्या उष्माघातानंतर रात्रीही उकाड्याचा विक्रम मोडत आहेत. दिल्लीत मे महिन्यात गेल्या 14 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र नोंदवली गेली. गुरुवारी सफदरजंगमध्ये किमान तापमान 31.9 अंश राहिले. हवामान विभागाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पारा 45 अंशांच्या पुढे राहण्याच्या अंदाजामुळे विजेची मागणी आणखी वाढेल.
ब्रह्मपुरी 47.2, वर्धा 47, यवतमाळ 45, अकोला 44, अमरावती 46.4, चंद्रपूर 46.4, गोंदिया 44.9, नागपूर 45.7, पुणे 37, लोहगाव 39.2, जळगाव 41.9, कोल्हापूर 33.5, महाबळेश्वर 27.3, मालेगाव 41.2, नाशिक 36.3, मालेगाव 41.2, सांगली 34.4, सातारा 35.7, सोलापूर 36.8, मुंबई 35, अलिबाग 38, रत्नागिरी 35.3, छ. संभाजीनगर 41.4, परभणी 41.3, बीड 40.5.
नवी दिल्ली: देशभरात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गुरुवारी (दि. 21) उच्चांकी 271 गिगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. सलग चौथ्या दिवशी वीज मागणीने उच्चांक मोडला. एकाच दिवसात पाच गिगावॅटने विजेची मागणी वाढल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली. दिवसभरातील उच्चांकी मागणी 270.80 गिगावॅट होती.