पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योजक मित्राने ५ लाख रूपये उसने दिले होते. ते पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्राने उद्योजकाची डोक्यात गोळी घालून हत्या केली. ही घटना सोमवारी (दि.७) उत्तर प्रदेशातील मेरठ येथील परतापूर येथे उघडकीस आली. पोलिसांनी मित्रावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. इमरान अली (वय ४९) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भूडबराल गावात राहणाऱ्या इरफानचा शताब्दीनगर येथे कॉपर वायरचा कारखाना आहे. इरफान हे गुरूवारी ३ एप्रिलला नमाज पढण्यासाठी स्कुटरवरून गेले होते. ते घरी परतलेच नाहीत. त्यानंतर त्यांचा मुलगा अमीर याने ते बेपत्ता झाल्याची परतापूर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांकडून इरफानचा शोध सुरू होता. दरम्यान सोमवारी त्याचा मृतदेह परतापूरमधील मेहरौली कालव्यात आढळून आला. त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्याची गोळी झाडून हत्या केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानंतर इरफानच्या कुटुंबातील सदस्यांनी इरफानचा मित्र जावेदचे नाव घेत व्यवहाराच्या वादातून हा खून झाल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी जावेदला ताब्यात घेत कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच जावेदने इरफान ५ लाखासाठी सतत तगादा लावत होता. यातून वाद झाल्याने रागाच्या भरात लोखडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.