रायपूर; पीटीआय : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका घरात पती-पत्नी, त्यांच्या दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून सामूहिक आत्महत्या केल्याचे हे संशयास्पद प्रकरण असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
हा प्रकार संजयनगर भागातील पीडितांच्या भाड्याच्या घरात घडला. शुक्रवारी उशिरा रात्री ही घटना उघडकीस आली. साजिद अली ऊर्फ सज्जू (वय ५०), पत्नी राबिया बानो (४५), मुलगा इरशाद अली (२०) आणि मुली शाहिदा बेगम (१५) व इरशाबा परवीन (१२) अशी या पाचजणांची नावे आहेत.
प्राथमिक तपासानुसार, संबंधिताने कुटुंबीयांना विष देऊन स्वतः गळफास लावून आयुष्य संपवल्याचा अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. कुटुंबाला वारंवार फोन करूनही उत्तर मिळत नव्हते. शिवाय बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालक व शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर साजिदचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर त्याची पत्नी, मुलगा आणि मुलींचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते. हे कुटुंब गेल्या आठ महिन्यांपासून या भाड्याच्या घरात राहात होते. साजिद हा जुन्या बॅटऱ्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता.