पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील भागलपूर येथे आज (दि.२०) केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये विश्वजीत यादव यांचा मृत्यू झाला आहे तर जयजीत यादव गंभीर जखमी झाले आहेत. नित्यानंद राय यांची बहिणीही गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर डॉ. एन.के. यादव यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Bihar News )
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे भाचे जयजीत यादव आणि विकास यादव हे भागलपूरमधील जगतपूर गावाचे रहिवासी आहेत. यांच्या किरकोळ कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गोळीबार झाला. गोळी लागल्यानंतर जखमी भावाने बंदूक हिसकावून घेतली आणि दुसऱ्या भावावर गोळीबार केला. यात विश्वजीत यादव यांचा जागीच मृत्यू झाला. जयजीत यादव गंभीर जखमी झाले. गोळीबारावेळी दोघांनाही वाचवण्यासाठी गेलेल्या नित्यानंद रा यांच्या आईलाही गोळी लागली आहे. त्यांच्यावर भागलपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती गंभीर आहे.
जयजीत यादव यांना भागलपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.नौगाछिया पर्वत पोलीस ठाण्याचे प्रमुख शंभू कुमार यांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये पाण्यावरून वाद झाला होता. यावरुन गोळीबार झाला आणि दोन्ही भाऊ जखमी झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या कुटुंबाशी संबंधित हे प्रकरण राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना नौगाछियाचे पोलीस अधीक्षक प्रेरणा कुमार म्हणाल्या की, आज सकाळी ७.३० च्या सुमारास जगतपूर गावात दोन भावांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची माहिती आम्हाला मिळाली. या घटनेत एक भाऊ जखमी झाला आणि एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी हे पाण्याच्या नळावरून भांडण झाल्याचे दिसून येते. विश्वजीत आणि जयजीत अशी या दोघांची ओळख पटली आहे. तातडीने कारवाई करण्यात आली आहे आणि जबाब नोंदवले जात आहेत. आमच्याकडे माहिती आहे (की हे दोघेही केंद्रीय मंत्र्याचे नातेवाईक आहेत)."