राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 Result : अखेर मतदारांनीच बंद पाडला “ईव्हीएम” विरोधातील आवाज

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसह निवडणूक आयोग विरोधकांच्या रडारवर होता. मात्र, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यामुळे निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मशीनबद्दल कोणी एकही शब्दही काढला नाही. परिणामी संपूर्ण निवडणूक काळात बदनाम झालेले ईव्हीएम मशीन विरोधकांनाही आवडू लागल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येक टप्प्यात मतदान पार पडताच ईव्हीएम मशीनबाबतच्या तक्रारींचे उत्तर देताना निवडणूक आयोगाच्या नाकी नऊ आले होते. विरोधकांच्या विविध शंकांचे निरसन करूनही त्यांचे समाधान होत नव्हते. सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएम मशीन हॅक केले जाईल. मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन बदलविल्या जातील, यासारखे कितीतरी आरोप विरोधकांनी लावले. या आरोपांवर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्यासह इतर दोन आयुक्त देखील हैराण झाले होते. उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ईव्हीएम मशीनचा वाद पोहोचला. निवडणूक आयोगाने न्यायालयातही ईव्हीएम मशीन हॅक अथवा बदलले जाऊ शकत नाही, याबाबत सबळ पुरावे सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनविरोधात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी झाली. विरोधकांनी सगळ्या शंकांचे निरसन करून घेतले. मात्र, विरोधकांच्या डोक्यातून ईव्हीएम मशीनबाबतचा राग काही केल्या जात नव्हता. ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांनी सारखी ओरडा- ओरड केल्यामुळे मतदारांच्याही मनात शंका निर्माण झाली होती.

पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाल्यापासून शेवटच्या टप्प्याचे मतदान संपेपर्यंत ईव्हीएम मशीनबाबतची शंका कायम होती. अखेर मतदारांनीच सत्ताधारी आणि विरोधकांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्यापासून रोखतानाच इंडिया आघाडीला सशक्त विरोधकांची भूमिका निभावण्याचा अधिकार दिला. निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही खुश झाले. ईव्हीएम मशीनच्या तक्रारीचा आवाजही अचानक बंद झाला. निवडणूक आयोगाने त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT