नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला आणि त्यांना देशातून हाकलून लावले. भाजप केवळ देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे, असे म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला. देशात २-३ व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीसारखे काम करत आहेत असेही राहुल गांधी म्हणाले. मागील २ दिवस राजधानी दिल्लीतील नवीन काँग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी विविध राज्यातील जिल्हाध्यक्षांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाध्यक्षांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशात दोन विचार आहेत. एका बाजूला आरएसएसचा विचार आहे जो हुकूमशाही, भेदभाव आणि दुर्बल घटकांवर अत्याचाराची भावना पसरवतो. तर दुसरीकडे काँग्रेसचा विचार आहे, ज्याने आपल्याला स्वातंत्र्य दिले. देशात आज २-३ मोठे उद्योगपती ईस्ट इंडिया कंपनीसारखे काम करत आहेत. ते मीडिया, दुरसंचार, पायाभूत सुविधा, जमीन, बंदरे आणि संरक्षण करारांपासून सर्वच खरेदी करत आहेत. तर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या. आपण अधिक मेहनत केली असती तर २०-३० जागा अधिक जिंकून सरकार स्थापन करू शकलो असतो. काँग्रेस पक्ष संसदेसह मैदानावरही भाजप आणि आरएसएस दोघांशीही लढत आहे. देशात सामाजिक न्याय पुनर्संचयित करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकार जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीय द्वेष निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना खर्गे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष हे केवळ संदेशवाहक नसून ते काँग्रेस पक्षाचे सेनापती आहेत, जे जमिनीवरून नेतृत्व करत आहेत. काँग्रेसची विचारसरणी मजबूत आहे. संघटना मजबूत करण्यासाठी आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.