farmers protest delhi march jagjit singh dallewal khanauri border
पुढारी ऑनलाईन : भारत-अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. हे लक्षात घेता खनौरी-दातासिंहवाला बॉर्डर सील करण्यात आली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग केली आहे.
पंजाबचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली 16 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर जींदमधील खनौरी-दातासिंहवाला बॉर्डर सील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर बॅरिकेडिंग, मोठे दगड आणि कंटेनर लावले आहेत.
जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) यांनी 16 ऑगस्टपासून ‘किसान बचाओ पदयात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारत-अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात काढण्यात येणारा हा पायी मोर्चा दातासिंहवाला येथून सुरू होऊन 29 ऑगस्टला दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या या 228 किलोमीटर लांबीच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी खनौरी बॉर्डरवर सुरक्षेचे कडक उपाय केले आहेत. व्हिडिओमध्ये पोलिसांनी बॉर्डरवर बॅरिकेडिंग आणि कंटेनर लावून संपूर्ण मार्ग कसा बंद केला आहे, हे पाहायला मिळत आहे.
दातासिंहवाला परिसरात बॅरिकेडिंग
खनौरी-दातासिंहवाला सीमेवर हरियाणाच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी येथे पाच थरांची बॅरिकेडिंग केली आहे. रस्त्यावर कंटेनर तसेच मोठे दगड ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. शेतकऱ्यांचा जमाव हरियाणात प्रवेश करून दिल्लीच्या दिशेने पुढे जाऊ नये, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा झाल्यानंतर जींद प्रशासनाने रात्री उशिरापासून सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली. पोलिसांची संख्या वाढवण्यासोबतच मार्गही बंद करण्यात आला आहे. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बॉर्डरच्या सुरक्षेवर आहे. शेतकरी नेत्यांनी 16 ऑगस्टपासून पदयात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात बॉर्डरवरील परिस्थिती कशी राहते, यावर प्रशासनाची नजर आहे.