Extramarital Dating App file photo
राष्ट्रीय

Extramarital Dating App: विवाहबाह्य डेटिंग ॲपवर महिलांची संख्या का वाढतेय? 'अशा' पुरुषांना देतात सर्वाधिक पसंती

भारतात कुटुंब व्यवस्थेला आणि विवाहसंस्थेला मोठे महत्त्व दिले जाते, मात्र वास्तवात नातेसंबंधांबाबतची मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Extramarital Dating App Gleeden

नवी दिल्ली: भारतात कुटुंब व्यवस्थेला आणि विवाहसंस्थेला मोठे महत्त्व दिले जाते, मात्र वास्तवात नातेसंबंधांबाबतची मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 'ग्लिडन' (Gleeden) या एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲपच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतातील त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या तब्बल ४० लाखांच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे, भारतीय पारंपारिक चौकट मोडून नातेसंबंधांमध्ये नावीन्य शोधत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Gleeden च्या सर्वेक्षणात 'आयटी हब' म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू १८ टक्के वापरकर्त्यांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ हैदराबाद (१७%), दिल्ली (११%), मुंबई (९%) आणि पुणे (७%) यांचा क्रमांक लागतो. मात्र, केवळ महानगरेच नव्हे तर लखनौ, सुरत, चंदीगड आणि गुवाहाटी यांसारख्या निमशहरांतूनही या ॲपला मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार, मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूतील कांचीपुरममध्येही अशा संबंधांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते.

महिलांची संख्या वाढली

भारतात पारंपरिक कुटुंबव्यवस्था आणि विवाहसंस्थेला ‘पवित्र’ मानले जात असले तरी आधुनिक काळात अनेकजण आपल्या नात्यांमध्ये काहीतरी कमी असल्याची भावना व्यक्त करत आहेत. या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिला वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली वाढ. गेल्या दोन वर्षांत महिलांच्या सहभागामध्ये १४८ टक्क्यांची भर पडली आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर ६५ टक्के पुरुष तर ३५ टक्के महिला आहेत. २५ ते ३० वयोगटातील महिलांशी संवाद साधण्याकडे पुरुषांचा कल आहे. ३० ते ४० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेले पुरुष, विशेषतः डॉक्टर, सीए आणि वरिष्ठ अधिकारी असलेल्या जोडीदाराला महिला प्राधान्य देत आहेत.

दुपारी आणि रात्रीच्या वेळी सर्वाधिक संवाद

भारतीय वापरकर्ते या ॲपवर दररोज सरासरी १ ते १.५ तास संवाद साधतात. यामध्ये दुपारी १२ ते ३ आणि रात्री १० ते १२ या काळात वापरकर्ते सर्वाधिक सक्रिय असतात.

का वाढतोय कल?

या बदलत्या मानसिकतेवर भाष्य करताना ग्लिडन इंडियाच्या कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल म्हणाल्या, "भारतात विवाह ही एक पवित्र संस्था मानली जाते, तरीही अनेक लोक भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी या मार्गाचा अवलंब करत आहेत. ही एक प्रकारची शांत क्रांती आहे."

काही वापरकर्त्यांच्या मते, वैवाहिक आयुष्यातील कंटाळवाणेपणा आणि जोडीदाराकडून न मिळणारी भावनिक साथ यामुळे ते या प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. तर काहींनी केवळ 'थ्रिल' किंवा 'उत्सुकता' म्हणून याकडे पाहत असल्याचे कबूल केले आहे. शेवटी, योग्य-अयोग्य यावर वाद सुरूच राहतील; पण 'ओपन मॅरेज' ही संकल्पना आता भारतात हळूहळू मूळ धरू लागली असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT