नवी दिल्ली : राज्यात ‘ईव्हीएम’ विरोधात चर्चा सुरु असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी शनिवारी खळबळजनक वक्तव्य केले. अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मधे घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ‘ईव्हीएम’वर माझा आक्षेप आहे, देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु असा इशारा जानकर यांनी दिला. मी स्वतः इंजिनियर आहे, ‘ईव्हीएम’ हॅक करता येते, असे जानकर म्हणाले. ‘ईव्हीएम’ मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते.
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे सरकारचे आहे, त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याच काम झाले असल्याचे जानकर म्हणाले. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे मी त्यांच्यापासून बाहेर आहे. काँग्रेसचा आणखी अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले. महायुतीला एवढे बहुमत मिळाले आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण बसवायचा? हे त्यांचे ते ठरवतील असे जानकर म्हणाले.
माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे, कोणासोबत जायचे याचा अजून निर्णय झालेला नाही. पण आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करु असे म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडचे आपल्याच पक्षाचे आमदार गुट्टे यांना इशारा दिला आहे.