पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून पुन्हा एकदा पत्नीने पतीचा छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सरकारी नोकरदार असलेल्या पत्नीच्या छळामुळे अभियंता पतीने आत्महत्या केली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील हॉटेलमधील एका खोलीतून अभियंत्याचा मृतदेह सापडला. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये मृत तरुण अभियंता माेहित यादव म्हणत आहे की, "जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. जर मुलांसाठी कायदा असता तर कदाचित मी हे चुकीचे पाऊल उचलले नसते. माझ्या पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे. बाबा, आई मला माफ करा".
मोहित यादव एका सिमेंट कंपनीत फील्ड इंजिनिअर म्हणून कामाला होता. तो औरैया जिल्ह्यातील दिबियापूरचा रहिवासी होता. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने प्रिया यादव नावाच्या मुलीशी लग्न केले. त्यांचा संसार सुखाने सुरु हाेता. दरम्यान प्रियाची बिहारमधील समस्तीपूर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली. त्यानंतर प्रियाच्या वागणुकीत बदल झाला. आई आणि भावाच्या सांगण्यावरून तिने पती मोहितचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केला. तिने माझ्यावर घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली हाेती.
जीवन संपविण्यापूर्वी मोहित यादव याने एक व्हिडिओ शेअर केला. या मध्ये म्हटले होते की, "माझी पत्नी प्रिया यादव हिच्या आईने प्रियाला गर्भपात करण्यास भाग पाडले. तिने दागिने आणि साड्या स्वतःकडे ठेवल्या आहेत. माझी पत्नी मला धमकी देत आहे की, घर आणि मालमत्ता माझ्या नावावर हस्तांतरित केली नाही तर मला आणि माझ्या कुटुंबाला हुंड्याच्या खोट्या आरोपात अडकवेल. मी मानसिक छळाला कंटाळलो आहे. आता माझ्या मृत्यूनंतर मला न्याय मिळाला नाही, तर माझी राख नाल्यात फेकून द्यावी. आई आणि बाबा, मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही".
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृताचा भाऊ तरण प्रताप म्हणाला की, "माझा भाऊ मोहित नोएडा येथील एका सिमेंट कंपनीत काम करायचा. प्रिया नोएडामध्येच राहत होती. दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले. यानंतर, सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. कुटुंबाच्या संमतीने हे लग्न झाले हाेते. लग्नानंतर तीन महिने सगळं ठीक होतं, त्यानंतर प्रियाने मोहितला त्रास द्यायला सुरुवात केली. तिने मोहितला कुटुंबापासून वेगळे केले आणि नंतर मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणू लागली हाेती."