ESIC Unemployment Benefit Schem Pudhari Photo
राष्ट्रीय

ESIC Unemployment Benefit Scheme: नोकरी गेल्यास सरकार देणार ५०% पगार! 'या' योजनेला जून २०२७ पर्यंत मुदतवाढ

ESIC च्या बैठकीत योजनेचा कालावधी ३० जून २०२७ पर्यंत वाढवला

पुढारी वृत्तसेवा

ESIC Unemployment Benefit Scheme: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) आपली अत्यंत लोकप्रिय बेरोजगारी भत्ता योजना म्हणजेच 'अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना' (ABVKY) आणखी एका वर्षासाठी वाढवली आहे.

ESIC च्या बैठकीत योजनेचा कालावधी ३० जून २०२७ पर्यंत वाढवला

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्‍या (ESIC) बैठकीत घेतलेल्या या निर्णयानुसार, आता ही योजना १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ पर्यंत लागू राहील. ईएसआय (ESI) च्या कक्षेत येणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी अनपेक्षितपणे किंवा सक्तीने राजीनामा देण्‍याचा आदेश देण्‍यात आला तरी सरकार त्याला नवीन रोजगाराच्या शोधादरम्यान आर्थिक मदत देणे सुरू ठेवेल. जाणून घेऊया नेमके या योजनेत किती पैसे मिळतात आणि कोण-कोण यासाठी दावा करू शकतात.

काय आहे अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना?

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना या योजनेची सुरुवात २०१८ मध्‍ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अचानक बेरोजगार होणाऱ्या नोकरदार लोकांना तात्पुरता आर्थिक दिलासा देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कर्मचारी नवीन कामाचा शोध घेत असताना आपले मूलभूत खर्च सहज भागवू शकतात.

योजनेअंतर्गत किती आणि काय फायदा मिळतो?

  • बेरोजगारीच्या काळात तुम्हाला तुमच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या ५०% रक्कम रोख भरपाई म्हणून दिली जाते.

  • हा आर्थिक लाभ बेरोजगारीच्या काळात जास्तीत जास्त ९० दिवसांसाठी दिला जातो.

  • क्लेम मंजूर झाल्यानंतर भत्त्याची संपूर्ण रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

  • ९० दिवसांच्या भत्त्यासाठी कोण क्लेम करू शकतं?

  • या बेरोजगारी भत्त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला ESIC च्या या अटी पूर्ण कराव्या लागतील:

  • कर्मचारी अनिवार्यपणे कर्मचारी राज्य विमा (ESI) योजनेअंतर्गत कव्हर केलेला असावा.

  • नोकरी सुटण्यापूर्वीच्या निर्धारित योगदान कालावधीत कर्मचाऱ्याचा ESI हिस्सा (अंशदान) जमा झालेला असणे आवश्यक आहे.

  • सर्वात महत्त्वाची अट म्हणजे नोकरी अनिच्छेने (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) सुटलेली असावी. उदाहरणार्थ, कंपनी किंवा कंपनीचा युनिट बंद पडणे, कर्मचारी कपात (छंटनी) होणे किंवा कामाशी संबंधित नसलेल्या दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व येणे.

कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही?

  • खालील परिस्थितींमध्ये कर्मचारी बेरोजगारी भत्त्यासाठी क्लेम करू शकत नाहीत

  • कर्मचाऱ्याने स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला असेल.

  • कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली असेल.

  • कामाच्या ठिकाणी गैरवर्तन किंवा शिस्तभंगाच्या कारवाईमुळे नोकरीवरून बडतर्फ केले गेले असल्यास.

  • कोणत्याही बेकायदेशीर संपात सामील झाल्यामुळे नोकरी गेली असल्यास.

कसा अर्ज करावा?

पात्र कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ESIC ने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये अर्ज भरून आपल्या आवश्यक कागदपत्रांसह जमा करू शकतात. ESIC च्या अधिकाऱ्यांकडून दाव्याची तपासणी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, बेरोजगारी भत्ता थेट तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात पाठवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT