राष्ट्रीय

Dhar Bhojshala Row |वसंत पंचमीनिमित्त विवादित भोजशाळेत हिंदूंना पूजा करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाची परवानगी

मुस्लिम समुदायही शुक्रवारची प्रार्थना करू शकतात : न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court on Dhar Bhojshala Row

नवी दिल्‍ली : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळा-कमल मौला मशीद परिसरात शुक्रवारी वसंत पंचमीनिमित्त हिंदूंना सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पूजा करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्याचबरोबर, मुस्लिमांना दुपारी १ ते ३ या वेळेत नमाज अदा करण्याची संमती देण्यात आली आहे.

दोन्‍ही समुदायांनी मागितली होती प्रार्थनेसाठी परवानगी

गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम समाजातील व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात यावी. येत्या २३ जानेवारीला शुक्रवारी वसंत पंचमी असून यादिवशी सरस्वती पूजनही केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांनी भोजशाळा संकुलात धार्मिक क्रिया पार पाडण्यासाठी परवानगी मागितली होती. यावर न्यायालयाने हा सुवर्णमध्य साधणारा निर्णय दिला आहे.

इतिहास काय सांगतो?

हजार वर्षांपूर्वी मध्‍य प्रदेशमधील धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोजने येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर 'भोजशाळा' म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली.1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली. ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.

धार संस्थानाने भोजशाळेला केले होते संरक्षित स्मारक घोषित

1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती.

तणावाच्‍या घटनांमुळे भोजशाळा चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी

12 मे 1997 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी भोजशाळेत सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली. मंगळवारी पूजा करण्यासही बंदी घातली. वसंत पंचमीच्या दिवशीच नमाज आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही बंदी 31 जुलै 1997 रोजी उठवण्यात आली. 6 फेब्रुवारी 1998 रोजी पुरातत्व विभागाने पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशावर बंदी घातली. मंगळवारची पूजाही बंद झाली. 2003 मध्ये पुन्हा मंगळवारी पूजा करण्यास परवानगी देण्यात आली. बँक्वेट हॉलही पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. 2013 मध्ये वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी पडल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. हिंदूंनी जागा सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी लाठीमार केला. 2016 मध्येही असचा प्रकार घडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT