पुढारी ऑनलाईन डेस्क : कमीत कमी वेळेत केसेस निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. न्यायालयात जास्त तारखा मागता येणार नाहीत, असे कायदे तयार केले जातील, याबाबतच्या ३ नव्या कायद्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.१४) दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, तीन कायद्यांसंदर्भात ही बैठक पार पडली. ७ वर्षे शिक्षा असलेल्या प्रकरणात महाराष्ट्रात फॉरन्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येत आहे. प्रत्येक न्यायालयात क्युबिकल तयार करण्यात येईल. न्यायालयातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. न्यायालयात जास्त तारखा मागता येणार नाहीत. कमीत कमी वेळात केस निकाली काढण्यासंदर्भात भर दिला जाईल. पोलीस, कर्मचाऱ्यांना नव्या कायद्याबाबत प्रशिक्षण द्यावे लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तहव्वूर राणा यांच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेने परवानगी दिली आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. आपण राणा यांची ऑनलाईन साक्ष घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संबंध स्पष्ट करून दिला आहे. आता खऱ्या अर्थाने २६/११च्या हल्ल्यातील लोकांना न्याय मिळेल.
पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याचा पुण्यात २२ फेब्रुवारीरोजी कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण दिले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.