नवी दिल्ली: कौटुंबिक वादामुळे पत्नीच्या नातेवाईकांनी ३१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना दिल्लीच्या बाह्य भागातील निहाल विहार येथे शुक्रवारी घडली. विनय गुप्ता असे या इंजिनिअरचे नाव असून तो लक्ष्मी पार्क येथील रहिवासी होता. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
विनय गुप्ता हा नोएडा येथील Adobe कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. त्याने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी बुध विहार येथील एका ३१ वर्षीय महिलेशी विवाह केला होता. त्यांना जुळी मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) असून ती साधारण चार महिन्यांची आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. ते निहाल विहार येथील गुप्ता यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गुप्ता यांना जबर मारहाण केली.
या मारहाणीत गुप्ता गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात सहभागी असलेल्या चौघांची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची मारहाणीतील त्यांच्या कथित भूमिकेबाबत चौकशी केली जात आहे. तसेच मारहाणीस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा आणि वादापूर्वी घडलेल्या घटनांचा देखील पोलीस तपास करत आहेत.
विभक्त राहत असलेली पत्नी परत यावी म्हणून नरबळी!
दुसरी एक धक्कादायक घटना ओडिशातील बोलांगिर जिल्ह्यातील बगदा गावात उघडकीस आली आहे. विभक्त झालेली पत्नी परत यावी यासाठी अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या भयानक प्रकारातून एका ४० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी शत्रूघ्न साहू (रा. बगदा) या मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. संतोष खारसेल (रा. तेबादमुंडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी शत्रूघ्न साहू याने संतोष याला जेवणाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले होते. संतोष रात्री झोपी गेल्यानंतर आरोपी साहू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याचा शिरच्छेद केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे धड गावाबाहेरील एका तलावात फेकून दिले, तर कापलेले शिर साहू याने आपल्या घरातील देवघरात लपवून ठेवले होते.