Delhi Peeragarhi Car Dead Bodies: दिल्लीच्या पीरागढी भागात एका गाडीत तीन मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना देखील या अजब प्रकरणामुळं तपासात कोडं पडलं होतं. सुरूवातीला हा प्रकार सामुहिकरित्या जीवन संपवण्याचा दिसत असला तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गाडीत 'बाबा'च्या वेशात बसलेली एक व्यक्ती देखील दिसली होती. यानंतर या गाडीत तीन लोकं मृत अवस्थेत आढळून आळे होते. यामुळे या व्यक्तीची या प्रकरणाशी काही लिंक आहे हा याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी साधारणपणे ३ वाजून ५० मिनिटांनी पीसीआरवर एक कॉल आला होता. त्यात कॉलरने पीरागढी फ्लायओव्हरजवळ एका गाडीत तीन लोकं बसली आहेत. मात्र ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर पोलीस टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी गाडीत तपासणी केली असता गाडीचे दरवाजे लॉक होते. ही गाडी ५० मिनिटे तिथं उभी होती.
पोलिसांनी सांगितलं की, हे तीन व्यक्ती मृत झाले असून त रणधीर (वय ७६), शिव नरेश सिंह (वय ४७), आणि लक्ष्मी देवी (वय ४०) अशी त्यांची ओळख पटली आहे. रणधीर आणि शिव नरेश बापरोलाचे रहिवासी होते तर लक्ष्मी देवी जहांगीरपुरीची राहणारी होती. लक्ष्मी ही मुळची बिहारची होती. रणधीर ड्रायव्हर सीटवर बसले होते. तर शिव नरेश आणि लक्ष्मी हे मागच्या सीटवर बसले होते. पोलिसांनी सांगितलं की ही कार रणधीरची होती.
पोलिसांना प्राथमिक तपासात हा प्रकार सामुहिकरित्या जीवन संपवण्याचा वाटत होता. या तिघांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये विष मिसळून ते प्राशन केलं असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. मात्र ज्यावेळी पोलिसांनी अधिक तपास केला त्यावेळी यात एका बाबाची देखील भूमिका असू शकते असा नवा अँगल आला आहे.
मृतदेहांच्या जवळ तीन दारूच्या बाटल्या आणि तीन डिस्पोजेबल ग्लास आढळून आले होते. पोलिसांनी सांगितलं की नरेश आणि लक्ष्मी यांच्या तोंडातून उलटी निघाली होती.
पोलिसांनी सांगितलं की ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी बाबा या गाडीच्या पुढच्या सीटवर बसला होता. त्याने तिघांची चर्चा देखील केली होती. मृत झालेल्या व्यक्ती संशयित बाबाच्या संपर्कात होते. हे सतत त्यांना भेटत होते. पोलीस आता या प्रकरणात हा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला की त्यात काही वेगळे षडयंत्र आहे का या अँगलने तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की हे प्रकरण क्लिष्ट करणारी माहिती देखील समोर आली आहे. लक्ष्मी देवी आणि शिव नरेश यांचे संबंध होते. रणधीर आणि शिव नरेश हे गेल्या सहा वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही प्रॉपर्टीशी निगडीत कामामध्ये पार्टनर होते. दोघांचेही कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे होते. मात्र या दोघांचे कुटुंबीय लक्ष्मीला ओळखत नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीने दोन लग्ने केली होती. एक पती बिहारमध्ये रहातोय तर दुसरा पती हा दिल्लीत राहतोय.
दरम्यान, पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. यावरून मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्राथमिकदृष्ट्या मृत्यू हा विषामुळं झाल्याचं दिसत आहे. मात्र फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन रिपोर्टनंतर गोष्टी स्पष्ट होतील. या प्रकरणात काही काळंबेरं आहे का याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
पोलिसांनी सांगितलं की तीनही मृत व्यक्तींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे कॉल रेकॉर्ड, मेसेज तसेच चॅटची देखील तपासणी होणार आहे. कारच्या रूटवरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार आहेत.
दरम्यान, रणधीर यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात आत्महत्येचा अँगल फेटाळून लावला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की रणधीर एक हसतमुख व्यक्ती होते. टोकाचं पाऊल उचलावं असं कोणतंच कारण नव्हतं.