Delhi Building Fire
नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम भागात आज (दि. १८) सकाळी एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या पाच मजली इमारतीच्या तळघर आणि पहिल्या दोन मजल्यांवर कपडे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा करण्यात आला होता, तर वरचे मजले निवासासाठी वापरले जात होते. येथे अचानक आग लागली. अग्निशमन दलाला सकाळी ७:०० वाजता या आगीची माहिती मिळाली, ज्यानंतर तातडीने ३० अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीतून जीव वाचवण्यासाठी दोन व्यक्तींनी इमारतीवरून खाली उड्या मारल्या, ज्यात ते जखमी झाले असून त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये प्रवेश (३५), कमल (४०), आशू (३२) यांच्या तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. आयजीआय (IGI) रुग्णालयात दाखल ३८ वर्षीय महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. येथे एका पुरुषासह दोन वर्षांच्या चिमुरडीवर उपचार सुरू आहेत. सफदरजंग रुग्णालयात २५ टक्के भाजलेल्या तरुणाला दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १० जणांना वाचवून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत दंडाधिकारी चौकशीचे (Magisterial Inquiry) आदेश दिले आहेत. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंह संधू यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.