नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवाः दिल्लीचा विकास रोखण्यासाठी केंद्र सरकारने मला तुरुंगात टाकले, असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केला. आम आदमी पक्षातर्फे ‘जनसंपर्क अभियाना’ला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर दिल्लीचा विकास थांबवल्याचे आरोप केले.
केजरीवालांनी दिल्लीच्या जनतेला खुले पत्र लिहीले आहे, ते पत्र या कार्यक्रमात त्यांनी वाचून दाखवले. त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले? हे सांगण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहीले आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत जनसंपर्क अभियान चालणार आहे. या अभियानात केजरीवालांचे पत्र पक्षाकडून दिल्लीकरांच्या घराघरात पोहोचवले जाणार असल्याचे केजरीवालांनी यावेळी सांगितले.
‘जनसंपर्क अभियाना’ची सुरुवात करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी भ्रष्टाचार करु शकत नाही. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील काम, सुविधा रोखण्यासाठी मला तुरुंगात टाकले. भाजपचे २२ राज्यामध्ये सरकार आहे. त्या एकाही राज्यात दिल्ली सरकारसारखे काम केले जात नाही, असेही केजरीवाल म्हणाले. मागच्या १० वर्षांमध्ये नायब राज्यापालांच्या माध्यमातून दिल्लीचे काम रोखण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तुरुंगामध्ये असताना शुगरचे इंजेक्शन दिले नाहीत, त्यामुळे माझा मृत्यूही झाला असता, असे ते म्हणाले. दिल्लीतील जनतेने भाजपला मतदान केले आणि त्यांचे सरकार आले. तर दिल्लीतील मोफत वीज, पाणी, महिला बस, सरकारी शाळा, सरकारी रुग्णालये, वृद्धांसाठीची तिर्थयात्रा या सगळ्या सुविधा बंद होतील, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाने जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्ष मुख्यालयात अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यासह पक्षाचे नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.