लखनौ : हाथरस दुर्घटनेनंतर स्वयंघोषित भोले बाबा याने मृत्यू अटळ असून त्याला कुणीही रोखू शकत नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशातील सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला आणि बालकांचा समावेश होता.
उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत भोले बाबा याच्या वाहनाच्या ताफ्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपासून पोलिसही त्याच्या मागावर आहेत. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला की, जे होणार आहे, त्याला कुणी टाळू शकत नाही.