Cough syrup tragedy
छिंदवाडा : सर्दी-खोकल्यासाठी खराब कफ सिरप प्यायल्याने छिंदवाडा जिल्ह्यामध्ये गेल्या २० दिवसांत सात चिमुकल्यांचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मुलांनी नागपूरमधील खासगी रुग्णालयांत अखेरचा श्वास घेतला.
जिल्हाधिकारी शीलेन्द्र सिंह यांनी या घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात दूषित कफ सिरपमुळेच मुलांच्या किडन्या निकामी झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर संबंधित कफ सिरपवर जिल्ह्यामध्ये तातडीने बंदी घालण्यात आली असून या प्रकरणाची पुढील चौकशी सध्या सुरू आहे.
पहिला संशयित रुग्ण २४ ऑगस्ट रोजी समोर आला होता, तर ४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत परासिया भागात सहा निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले आहे की, प्राथमिक तपासणी अहवालात दूषित कफ सिरपमुळे मुलांची किडनी निकामी होऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित कफ सिरप जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, या दूषित औषधाची निर्मिती करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या जबाबदार घटकांना सरकारी कारवाईचा 'डोस' कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
मृत्यू झालेल्या बालकांपैकी अनेकांच्या किडनीची बायोप्सी तपासणी करण्यात आली आहे. छिंदवाडा मेडिकल कॉलेजमधील शिशु रोग विशेषज्ञ डॉ. पवन नांदुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल नावाचा घटक दूषित अवस्थेत आढळला आहे. हाच सिरप मुलांना देण्यात आल्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली. नागपूर प्रयोगशाळेतून आलेल्या किडनी बायोप्सी अहवालात 'टॉक्सिन मीडिएटेड इंजरी' ची पुष्टी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉलचे दूषितीकरण झाले असावे, ज्यामुळे बालकांच्या किडनीवर जीवघेणा परिणाम झाला.
या गंभीर घटनेनंतर, नेक्सट्रो-डीएस आणि कोल्ड्रिफ या दोन कफ सिरपच्या विक्रीवर छिंदवाडासह भोपाळमध्येही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. हे दोन्ही सिरप तमिळनाडू येथील एका फार्मा कंपनीत बनवले आहेत.