नवी दिल्ली : भारत देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे कायम प्रेरणास्त्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यापैकी निवडच करायची असेल तर देश छत्रपती शिवाजी महाराजांची निवड करेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केले. काँग्रेसच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न झाल्येचही ते म्हणाले. तसेच औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
कर्नाटकात मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर संसदेतही गदारोळ झाला. याच संदर्भात भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. मतांसाठी संविधान बदलणे हा काँग्रेस पक्षाचा छुपा अजेंडा आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ही फक्त एक सुरुवात आहे. भारतीय संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर व्यक्त होत आपली भुमिका कधी स्पष्ट करतील, असा प्रश्नही त्यांनी विचारला.