नवी दिल्ली : दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या श्रेयावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. गुरुवारी, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दहशतवादी तहव्वूर हुसेन राणा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे श्रेय यूपीए सरकारच्या राजनैतिक, कायदेशीर आणि गुप्तचर प्रयत्नांचे परिणाम असल्याचे सांगितले. प्रत्यार्पण कोणत्याही भव्यदिव्यतेचा परिणाम नाही, असे चिदंबरम म्हणाले.
गुरुवारी जारी केलेल्या सविस्तर निवेदनात, ज्येष्ठ काँग्रेस नेते चिदंबरम म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार प्रत्यार्पणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे प्रत्यार्पण २००९ मध्ये सरकारने सुरू केलेल्या कामाचे हे फलित असल्याचे ते म्हणाले.
नोव्हेंबर २००९ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तहव्वुर राणा, डेव्हिड हेडली आणि इतरांविरुद्ध २६/११ चा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली. त्याच वर्षी, लष्कर-ए-तोयबाच्या अयशस्वी कटात मदत केल्याबद्दल अमेरिकेच्या एफबीआयने शिकागोमध्ये राणाला अटक केली, असे चिदंबरम म्हणाले. परस्पर कायदेशीर सहाय्य करार (एमएलएटी) अंतर्गत अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यांमुळे २०११ मध्ये एनआयएने आरोपपत्र दाखल केले, त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट आणि इंटरपोल रेड नोटिस जारी करण्यात आल्या, असे ते म्हणाले.