नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- भाजप खासदार निशिकांत दुबे आणि दिनेश शर्मा यांनी न्यायव्यवस्था आणि देशाच्या सरन्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या विधानांशी भाजपचा काहीही संबंध नाही, असे असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले. तर याच मुद्द्यावरून भाजपाचे मावळते अध्यक्ष हे दोन्ही खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवतील का? तसेच त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असे प्रश्न काँग्रेसने विचारले. भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरले आहे.
भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि दिनेश शर्मा यांच्या न्यायव्यवस्था आणि देशाच्या सरन्यायाधीशांबद्दल केलेल्या वक्तव्यावर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाष्य केले. ते म्हणाले की दोन्ही खासदारांनी केलेली वक्तव्य त्यांची वैयक्तिक वक्तव्य आहेत. भाजप त्यांच्याशी सहमत नाही आणि अशा वक्तव्याचे कधीही समर्थन करत नाही. भाजप या विधानांना पूर्णपणे नाकारते. भाजपने नेहमीच न्यायव्यवस्थेचा आदर केला आहे आणि त्यांचे आदेश, सूचना आनंदाने स्वीकारल्या आहेत. एक पक्ष म्हणून आमचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयासह देशातील सर्व न्यायालये आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेत आणि संविधानाच्या संरक्षणाचे मजबूत आधारस्तंभ आहेत. मी दोन्ही खासदारांना आणि इतर सर्वांना अशी विधाने करू नयेत असे निर्देश दिले आहेत.
जे. पी. नड्डा यांच्या या स्पष्टीकरणावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारताच्या सरन्यायाधीशांवर भाजपच्या दोन खासदारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून मावळत्या भाजप अध्यक्षांनी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे खासदार वारंवार द्वेषपूर्ण भाषणे देण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. भाजपच्या मावळत्या अध्यक्षांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे डॅमेज कंट्रोल शिवाय दुसरे काहीही नाही. हे 'संपूर्ण राज्यशास्त्राचे' उदाहरण नाही तर 'संपूर्ण राजकीय ढोंगाचे' उदाहरण आहे. भाजपच्या अध्यक्षांनी त्यांच्याच पक्षात उच्च संवैधानिक पदावर असलेल्या एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीने न्यायव्यवस्थेवर वारंवार केलेल्या अस्वीकार्य वक्तव्यावर पूर्णपणे मौन बाळगले आहे. भाजपचा या विधानांना पाठिंबा देते का? जर संविधानावर अशा सतत होणाऱ्या हल्ल्यांना पंतप्रधान मोदींची कोणतीही मूक मान्यता नाही, तर भाजप अध्यक्ष या खासदारांवर कठोर कारवाई का करत नाहीत? त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली का? असे प्रश्नही जयराम रमेश यांनी विचारले.