पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी सुरक्षा कर्मचार्यांसह उपस्थित काँग्रेस नेत्यांनी त्यांना पाणी दिले. त्यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले.
जम्मू-काश्मीरमधील जसरोटा येथे आज (दि. २९ सप्टेंबर) मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभा होती. व्यासपीठावर भाषण करत असताना खर्गे यांना भोवळ येवू लागली. यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि काँग्रेस नेत्यांनी वेळीच त्यांची काळजी घेतली. त्यांना पाणी दिले. यावेळी काही काळ भाषण थांबवण्यात आले.
प्रकृती स्थिर झाल्यानंतर बोलताना खर्गे म्हणाले, आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी सध्या ८३ वर्षांचा आहे. माझा इतक्या लवकर मृत्यू होणार नाही. पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर असेपर्यंत मी जिवंत असेन. जम्मू-काश्मीर राज्यात भाजप नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला कधीच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. त्यांची इच्छा असती तर एक-दोन वर्षात निवडणुका होऊ शकल्या असत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना येथे निवडणुका घेणे भाग पडले आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. दहा वर्षांत तुमच्या आयुष्यात समृद्धी आणलेले नाही, अशा व्यक्तीवर तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता?, असा सवाल करत पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये येवून तरुणांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशातील तरुणांना अंधारात ढकलले आहे, असा आरोपही खर्गे यांनी यावेळी केला.