नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात देशामध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राजधानी दिल्लीत बैठकांचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. 25) काँग्रेस मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चार राज्यापैकी सर्वात प्रथम सोमवारी (दि.24) झारखंड राज्याची बैठक झाली आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये तर 26 जून रोजी हरियाणाची आणि 27 जून दिवशी जम्मू काश्मीरची बैठक होणार आहे. या बैठकींसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनील केदार, नितीन राऊत, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील आदी प्रमुख 25 नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये 17 जागा लढवून त्यातील 13 जिंकल्या आहेत. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेसचे संख्याबळ सर्वात जास्त आहे. या धरतीवर महाविकास आघाडीत काँग्रेस आता मोठा भाऊ असल्याने विधानसभा निवडणुकीत राज्यात जास्त जागा लढवाव्या, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.