पुढारी ऑनलाईन डेस्क - माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीरवरून वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दिल्लीत 'Five Decades of Politics' या स्मृतीग्रंथाच्या लॉन्चिंगवेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याची आठवण सांगितली. आठवण सांगत असतानाच त्यांना आलेले अनुभवदेखील सांगितले. यावेळी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याची आठवण काढत असताना त्यांनी अशी गोष्ट सांगितल की, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "मी गृहमंत्री होण्यापूर्वी त्यांना (शिक्षणतज्ज्ञ विजय धर) भेटायला गेलो होतो. मी त्यांना सल्ला विचारायचो. त्यांनी मला सल्ला दिला. इकडे तिकडे फिरू नका, तर लाल चौकात (श्रीनगर) जा, लोकांना भेटा आणि दल सरोवराभोवती फिरायला जा. या सल्ल्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना वाटले की इथे एक गृहमंत्री आहे, जो बिनधास्त जातो, पण कुणाला सांगू, माझी काय..होती? शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर हॉलमधील संपूर्ण श्रोते हसू लागले. नंतर ते म्हणाले, लोकांना हसवण्यासाठी मी हे म्हटलं होते. शिंदे यांनी ही गोष्ट दिल्लीत 'फाईव्ह डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स' या स्मृतीग्रंथाच्या लॉन्चिंगप्रसंगी सांगितली.
विजय धर यांच्या आग्रहावरूनच सुशील कुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना श्रीनगरमधील डीपीएस शाळेला भेट दिली होती. ही शाळा विजय धर चालवायचे.
यावेळी व्यासपीठावर दिग्विजय सिंह , मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्ला करणे सुरु केले. भाजपाचं म्हणणं होतं की, सुशील कुमार शिंदे यांनी संपूर्ण गोष्टीचा उलगडा केला आहे की, काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये कशी परिस्थिती होती. यावर काँग्रेसला लक्ष द्यायला हवं.