नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे केंद्रातील काँग्रेस आणि डीएमके या बऱ्याच काळापासून एकत्र असलेल्या मित्रांमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेसने तामिळनाडूमध्ये टीव्हीकेप्रणीत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या डीएमकेने आता लोकसभेत काँग्रेससोबत बसण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभा सचिवालयाने डीएमकेच्या खासदारांना काँग्रेसपासून वेगळे बसण्यास मंजुरी दिली असून, त्यांच्यासाठी नवीन आसनव्यवस्था केली जात आहे.
डीएमकेच्या ज्येष्ठ नेत्या कनिमोझी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बदललेल्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत आसनव्यवस्था बदलण्याची मागणी केली होती. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अवघ्या पाच जागा जिंकल्या होत्या, तरीही त्यांनी डीएमकेची साथ सोडून थेट टीव्हीके सरकारमध्ये सामील होणे पसंत केले. डीएमके नेत्यांनी काँग्रेसच्या या भूमिकेला विश्वासघात आणि पाठीत सुरा खुपसणे असे म्हटले आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने 2014 मध्ये डीएमकेनेही एकट्याने निवडणूक लढवली होती, असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. या वादामुळे 8 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला डीएमके हजेरी लावण्याची शक्यता मावळली असून, दोन्ही पक्षांमधील दरी आता अधिकच रुंदावली आहे.