नवी दिल्ली : नीट पेपरफुटीची प्रकरणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत निषेध नोंदवत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका सिजेपीची प्रमुख अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांनी घेतली. दरम्यान, आंदोलनासाठी दिलेली परवानगी संपल्यानंतरही आंदोलन सुरू राहिल्याने दिल्ली पोलिसांनी आंदोलन बेकायदेशीर असल्याचे घोषित केले असून आंदोलकांना जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रविवारी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी पोलिसांच्या घोषणेला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत जबाबदारी निश्चित करण्याचा प्रश्न उपस्थित केला. शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. तसेच हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे नसून देशातील विद्यार्थी आणि संविधानाच्या हितासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलकांनी प्रशासनावर आंदोलन कमकुवत करण्यासाठी पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा बंद केल्याचा आरोपही केला. मात्र, आपल्या मागण्या योग्य असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही म्हटले. अभिजीत दीपके यांनी पोलिसांनी निष्पक्ष भूमिका घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने न पाहता त्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्दा म्हणून पाहावे, असे आवाहन केले.
रविवारी सकाळी राष्ट्रगीताने आंदोलनाची सुरुवात झाली. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आंदोलनात प्रमुखपणे मांडण्यात आले. आंदोलकांनी घोषणा देत सांगितले की, शिक्षण व्यवस्था, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित होईपर्यंत आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.