श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स प्रणीत सरकार स्थिर न राहू देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या पक्षाच्या आमदारांना फितवण्यासाठी आणि सत्तांतर घडवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पक्षातील एका आमदाराला बाजू बदलण्यासाठी चक्क २० ते ३० कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. विरोधी पक्षांकडून लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचे हे गंभीर कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अब्दुल्ला म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार निष्ठावंत असून अशा कोणत्याही दबावाला किंवा पैशांच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. जम्मू-काश्मीरच्या जनतेने दिलेल्या बहुमताचा आदर राखला जाईल आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 'माझ्या संयमाला माझी कमजोरी समजू नका', असा इशारा केंद्र सरकारला देत मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले, केंद्र सरकारने नेहमी 'योग्य वेळ' आल्यावर राज्याचा दर्जा देऊ, असे म्हणण्याऐवजी ती 'योग्य वेळ' नेमकी कधी येणार, याची कालमर्यादा स्पष्ट करावी. 'जर केंद्र सरकार लडाखच्या लोकांशी चर्चा करण्यास तयार आहे, तर जम्मू-काश्मीरच्या लोकांशी का नाही?' असा सवाल त्यांनी केला. 'जर तुम्हाला राजभवनातून (एलजी) प्रशासन चालवायचे होते, कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे होते आणि बुलडोझर चालवायचे होते, तर मग निवडणुका घेऊन आम्हाला पुढे कशासाठी केले?, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.