नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
हवामान बदल हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण पृथ्वीशिवाय मानवाला राहण्यासाठी दुसरा कोणताही ग्रह नाही, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते १९ व्या सीआयआय इंडिया-आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, जगासाठी भारताचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. जागतिक स्थिरता आणि शांततेचा संदेश देण्यासाठी भारत विकासाच्या मार्गावर काम करत आहे. उपराष्ट्रपतींनी २०२३ मध्ये भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-२० चा कायमस्वरूपी सदस्य बनल्याबद्दल आफ्रिकन युनियनचे कौतुक केले. भारताला चित्त्यांच्या माध्यमातून देशातील जैवविविधता पुन्हा निर्माण करण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी आफ्रिकेचे आभारही व्यक्त केले.
यावेळी बुरुंडी प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष प्रॉस्पर बाझोम्बांजा, गांबिया प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष मुहम्मद बी.एस. जॅलो, जेरेमिया कापन काँग, लायबेरिया प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष, मेरी सिरिल एडी बोईसन, मॉरिशस प्रजासत्ताक चे उपाध्यक्ष, डॉ. सी.जी.डी.एन. चिवेंगा, सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.