नवी दिल्ली : पोलिसांच्या कथित अमानुष वागणुकीविरोधात कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आज 24 जुलै रोजी देशभरात शांततापूर्ण आंदोलन करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या वाचून दाखवाव्यात, तसेच आंदोलनासाठी आवश्यक परवानगी आणि व्यवस्था करावी, असे आवाहन सीजेपीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणावर सीजेपीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारशी चर्चेसाठी त्यांनी दोन अटी ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चा होणार नाही. चर्चा जंतर-मंतरवर किंवा अन्य कोणत्याही तटस्थ ठिकाणी झाली पाहिजे, अशी पहिली अट ठेवली आहे. तर दुसरी अट म्हणजे सरकारने केवळ चर्चा न करता ठोस आश्वासन द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण केल्या जातील, याची स्पष्ट कालमर्यादा सांगावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दावा केला की, सरकारच्या प्रतिनिधींनी जंतर-मंतरवर येऊन चर्चा करण्यास नकार दिला. सरकारकडून आम्हाला जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले जात आहे. मात्र, चर्चा जंतर-मंतरवर किंवा तटस्थ ठिकाणीच झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टाबद्दल केलेल्या घोषणेवर बोलताना सीजेपीने सांगितले की, अशा घोषणा कोणत्याही कामाच्या नाहीत. हा केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला जबाबदारी आणि उत्तरदायित्व हवे आहे, असेही त्यांनी सांगितले.