श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम चेसोटी गावात 14 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीने भीषण विध्वंस घडवला आहे. या दुर्घटनेत 68 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. आता येथील वाचलेले ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेत जगत असून त्यांनी सरकारकडे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
ढगफुटीत आपले घर गमावलेले राकेश कुमार सांगतात, रात्र झाली की आम्हाला भीती वाटते. वार्याच्या किंवा पावसाच्या हलक्या आवाजानेही पुन्हा ढगफुटी होईल की काय, या भीतीने आमची झोप उडाली आहे. या दुर्घटनेने गावकर्यांवर, विशेषतः लहान मुले आणि महिलांवर खोलवर मानसिक आघात केला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून माचाईल माता यात्रेकरूंसाठी लावलेले सर्व ढाबे वाहून गेले आहेत.
आमचे गाव आता सुरक्षित राहिले नाही. सरकारने आम्हाला सुरक्षित ठिकाणी जमीन देऊन घर बांधण्यासाठी भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडेही आपले गार्हाणे मांडले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असले तरी गावकरी भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहेत आणि त्यांना फक्त आपल्या जीवाची सुरक्षितता हवी आहे.