पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. आता भाजप प्रणित 'एनडीए'तील चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. सरकार स्थापनेत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणा आहे. मात्र आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीत सहभागी होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आम्ही एनडीएबरोबरच आहोत, असे स्पष्ट करत स्वत: चंद्राबाबू नायडू यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
निवडणूक संपल्यानंतर दिल्लीला जाण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू म्हणाले की, माध्यमांमध्ये वेगवेगळे तर्कविर्तक लढवले जात आहेत. या देशाने अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. आम्ही एनडीएमध्ये आहोत, मी एनडीएच्या बैठकीला जात आहे. राजकारणात चढ-उतार नेहमीचे असतात. इतिहासात अनेक राजकीय नेते आणि पक्षांची हकालपट्टी झाली आहे. ही ऐतिहासिक निवडणूक ठरली.
आंध्र प्रदेश राज्याच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी एनडीए आघाडी स्थापन करण्यात आली आहे. आम्हाला राज्यातील 55.38% मतदान झाले आहे. तेलुगू देसम पार्टीला ४५ टक्के आणि वायएसआरसीपीला ३९ टक्के मते मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपची मजल २४० जागांवरपर्यंत गेली आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी २७२चे संख्याबळ आवश्यक आहे. भाजप प्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय नोंदवला आहे. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू हे आता किंगमेकर आहेत. ते लवकरच इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुणात रंगली होती. त्यांच्याबरोबर जेडीयू नेते नितीश कुमारही इंडिया आघाडीच्या गळ्याला लागतील, अशी शक्यता वर्तवली जावू लागली होती. मात्र आता चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.