पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी (दि.11) एका मोठ्या कारवाईत ११ सशस्त्र कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. सशस्त्र कुकी फुटीरवाद्यांच्या टोळीने जिरीबाममधील बोरोबेकरा येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) ही धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर मणिपूर राज्यातील तणाव कायम आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यात सीआरपीएफच्या 20 अतिरिक्त कंपन्या राज्यात पाठवल्या आहेत ज्यात सुमारे 2,000 कर्मचारी आहेत.
मणिपूरला पाठवल्या जाणाऱ्या 20 नवीन केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) कंपन्यांपैकी 15 CRPF आणि पाच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर राज्यात आधीच तैनात केलेल्या CAPF च्या 198 कंपन्यांमध्ये ही युनिट्स सामील होतील. मागील वर्षी राज्यात झालेल्या हिंसाचारात 200 लोकांचा मृत्यू झाला होता.
जिरीबाममध्ये झालेल्या हिंसाचाराच्या नव्या फेरीमुळे गेल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, CRPFच्या २० कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत मणिपूर सरकारच्या अधीन काम करणार आहेत.