नवी दिल्ली : देशातील जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 रोजी सुरू होणार आहे. जनगणना प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार आहे. पहिल्यांदाच यामध्ये स्वगणनेचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक मोबाईल अॅप किंवा वेब पोर्टलवर आपली माहिती घरबसल्या भरू शकतील. गणनेसाठी सरकारने 33 प्रश्न अधिसूचित केले आहेत. विशेष म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी आपले संबंध स्थिर असल्याचे मानत असतील तर त्यांना ‘विवाहित’ मानले जाणार आहे.
भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वगणना करताना ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी प्रगणक (जनगणना करणारे कर्मचारी) घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. सर्व डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाय करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात घर आणि कुटुंबाशी संबंधित 33 प्रश्न विचारले जातील. यात घराचा प्रकार, रचना, भिंत-छप्पर-फरशीसाठी वापरलेले साहित्य, घरातील सदस्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची माहिती, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग, जेवण-खाण्याच्या सवयी, वाहन आणि इतर सुविधांची माहिती समाविष्ट असेल.
स्वगणना कशी करायची?
1) पोर्टल se.census.gov.in (https://se.census.gov.in) वर लॉगिन करा.
2) नकाशावर घराचे स्थान चिन्हांकित करा.
3) कुटुंबाचे तपशील भरा.
4) माहिती सबमिट करा आणि आयडी मिळवा.
5) आयडी प्रगणकाला द्या, ते माहिती जनगणनेत समाविष्ट करतील.
(ही सुविधा 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल.)
महाराष्ट्रासाठी वेळापत्रक
महाराष्ट्रात स्व-नोंदणी प्रक्रिया 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान होईल. त्यानंतर घरांची गणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान पार पडेल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा केली जाईल.