CDS General Anil Chauhan in UAV and C-UAS
नवी दिल्ली : “आपण कालच्या शस्त्रास्त्रांनी आजची युद्धं जिंकू शकत नाही. आयात केलेल्या परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास, आपल्या युद्ध सज्जतेवर परिणाम होतो आणि आपली क्षमता कमकुवत होते. आपल्या सुरक्षेसाठी स्वदेशी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे, असे परखड मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी मांडले.
दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे आयोजित UAV (Unmanned Aerial Vehicle) आणि C-UAS (Counter Unmanned Aerial Systems) या तंत्रज्ञान प्रदर्शनात भारताच्या संरक्षण धोरणावर त्यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
मे महिन्यात ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतात सोडलेले काही ड्रोन पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत सापडले. काहींचा तर वापरच झाला नसावा असे वाटते, असे ते म्हणाले.
CDS चौहान यांनी जोर देऊन सांगितले की, आजचे युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानानेच लढले जाईल. कालची शस्त्रास्त्रे आता उपयुक्त ठरत नाहीत. ऑपरेशन सिंदूरमुळे हे स्पष्ट झाले आहे की स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली C-UAS (Counter Unmanned Aerial System) प्रणाली अत्यंत आवश्यक आहे.
CDS चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत सांगितले की, या ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानने बिनशस्त्र ड्रोनचा वापर केला होता, परंतु भारताने त्यातील बहुतेक ड्रोन पाडले. “ते ड्रोन आमच्या लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतीही हानी पोहोचवू शकले नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
CDS चौहान म्हणाले, "ड्रोन हे युद्धातील असममित (Asymmetric) धोरणांचं नवं रूप आहे, ज्यामुळे मोठ्या सैनिकी साधनांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे लष्करांनी आता आपली हवाई रणनीती आणि संरक्षण तंत्रज्ञान पुन्हा नव्यानं आखायला हवं.
ड्रोन हे युद्धातील एक ‘इव्होल्यूशनरी’ बदल आहेत. लष्कराने त्यांचा वापर अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी पद्धतीने केला आहे. विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहून आपले उत्पादन आणि दुरुस्ती क्षमता कमी होते. त्यामुळे स्वदेशी यंत्रणांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.”
CDS म्हणाले, "आमच्या ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मिशन्ससाठी जर आपण आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलो, तर त्याचा फटका सज्जतेला बसतो. उत्पादन क्षमताही मर्यादित राहते, सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत आणि युद्धसज्जता कायम ठेवणे कठीण होते."
ते म्हणाले, “आपण जेव्हा आपली प्रणाली घरीच डिझाइन करतो, तयार करतो आणि नावीन्य आणतो, तेव्हा आपण आपली गुप्तता राखू शकतो, खर्च वाचवतो आणि उत्पादनावर आपला पूर्ण ताबा ठेवतो."
पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्युत्तरात भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर बिनशस्त्र ड्रोन आणि लोटणारी क्षेपणास्त्रं (loitering munitions) पाठवली होती. मात्र, भारतीय वायुदल आणि संरक्षण यंत्रणांनी त्यांना कशा प्रकारे निष्प्रभ केलं हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं.
चौहान म्हणाले की, “बहुतेक ड्रोन काइनेटिक आणि नॉन-काइनेटिक पद्धतींनी नष्ट करण्यात आले आणि काही ड्रोनवरुन कळते की ड्रोनमध्ये कार्यक्षमतेचा अभाव होता.”
जनरल चौहान यांनी भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची प्रशंसा करताना ‘आकाशतीर’ या माध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीचा उल्लेख केला, जी IGMDP (Integrated Guided Missile Development Program) अंतर्गत विकसित झाली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ‘आकाश NG’ या नव्या व्हेरियंटने ड्रोन स्वार्म्स आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा अचूक प्रतिकार केला. ही प्रणाली Mach 2.5 च्या वेगाने आणि 30 मीटर ते 20 किमीपर्यंतच्या उंचीवरील लक्ष्य भेदू शकते.