राष्ट्रीय

CBSE OSM Controversy | "मी पूर्ण जबाबदारी घेतो.." : CBSE OSM वादावर केंद्रीय शिक्षण मंत्री नेमकं काय म्‍हणाले?

CBSE OSM controversy : लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या आरोपांनाही दिले उत्तर

पुढारी वृत्तसेवा

CBSE OSM controversy

नवी दिल्‍ली : सीबीएसईच्या (CBSE) नवीन ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) वरून देशभरात सुरू असलेल्या गदारोळानंतर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मोठे वक्तव्य समोर आले आहे. या संपूर्ण वादाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की, या त्रुटींमागे असलेल्या दोषीवर कारवाई केली जाईल. तसेच त्‍यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले.

मी OSM प्रणालीमधील त्रुटींची जबाबदारी घेतो

धर्मेंद्र प्रधान यांनी आज शिक्षण मंत्र्यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठकही घेतली. यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षण मंत्री म्हणाले की, "OSM प्रणालीमध्ये ज्या काही त्रुटी समोर आल्या आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी ते स्वीकारतात. ते म्हणाले, "CBSE ने पहिल्यांदाच हा प्रयोग केला होता. त्यामध्ये काही विसंगती समोर येत आहेत, ज्याची जबाबदारी मी घेतो. ही चूक सुधारली जाईल आणि यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. आम्ही या कामात पूर्णपणे गुंतलो आहोत. एकाही विद्यार्थ्याची शंका अनुत्तरीत ठेवणार नाही."

शिक्षण मंत्र्यांकडून OSM सिस्टीमचा बचाव

यावेळी OSMचा चा बचाव करताना ते म्‍हणाले की, "CBSE इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबत जे काही मुद्दे समोर आले आहेत, त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. एकूण १७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी प्रत्येकाची मिळून ९८ लाख उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिकेत साधारण ४० पाने असतात, म्हणजेच एकूण जवळपास ४० कोटी पानांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. CBSE ने पहिल्यांदाच ही स्कॅनिंग सिस्टीम लागू केली आहे. OSM हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. भारतातील आणि जगातील अनेक नामांकित संस्था हे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी पुढे येत आहेत. हे 'स्टुडंट-सेंट्रिक' (विद्यार्थी-केंद्री) आहे, जेणेकरून मुलांना पारदर्शक पद्धतीने सर्व माहिती मिळू शकेल."

ही राजकारण करण्‍याची वेळ नाही

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देतशना शिक्षण मंत्र्यांनी म्हणाले, "राहुल गांधी एका वेगळ्याच मानसिकतेत पोहोचले आहेत. सातत्याने निवडणुका हरल्यामुळे ते हताश झाले आहेत. त्यांनी SIR ला विरोध केला, त्यांनी ईव्हीएमला (EVM) विरोध केला, त्यांनी डिजिटल इंडियाला विरोध केला. ते भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या बाजूने नाहीत.जेव्हा मी स्वतः सरकारतर्फे या विसंगतीची आणि अव्यवस्थेची जबाबदारी घेत आहे, तेव्हा त्यांनी अशी विधाने करायला नकोत. ही राजकारण करण्याची वेळ नाही. सध्या मुलांना मानसिक ताण (Mental Stress) येऊ नये, हे सर्वात महत्त्वाचे आहे." असेही ते म्‍हणाले.

OSM सिस्टीमवर नेमका गदारोळ का?

यंदापासून सीबीएसईने १२ वीच्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टीम सुरू केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून ऑनलाईन अपलोड केल्या जातात. यानंतर शिक्षक संगणकाच्या स्क्रीनवरच उत्तरपत्रिका तपासतात. गुणांची बेरीज कॉम्प्युटर स्वतः करतो जेणेकरून टोटलिंगमध्ये चूक होणार नाही.परंतु, या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना त्या पुसट (धुंद) स्कॅन होत आहेत, काही पाने गहाळ आहेत, तर एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रोल नंबरशी जोडली जात आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या वादानंतर सीबीएसईने देखील मान्य केले आहे की, जास्त ट्रॅफिकमुळे पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT