पुढारी ऑनलाईन डेस्क : पाणीपुरी हा आपल्या भारतीयांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. हे स्ट्रीट फूड देशभरात खाल्ले जाते. हे खूप चविष्ट आहे. लहान मुले असो वा प्रौढ, पुरुष असो वा महिला, सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते. परंतु कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला पाणी-पुरीच्या नमुन्यांमध्ये कॅन्सरला आमंत्रित करणारे घटक आढळले आहेत, त्यामुळे पाणीपुरी आता आरोग्यासाठी घातक ठरली आहे.
संपूर्ण कर्नाटकातील खाद्यप्रेमींसाठी ही धोक्याची घंटा आहे. कर्नाटकातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अलीकडील चाचण्यांमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी येथील लोकप्रिय स्ट्रीट फूड, पाणीपुरी, गोल गप्प्यांबाबत चिंताजनक परिणाम समोर आले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्ससह विविध स्त्रोतांकडून गोळा केलेल्या २६० नमुन्यांपैकी २२ टक्के नमुने सुरक्षा मानकांची पूर्तता करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
चाचणीदरम्यान अधिकाऱ्यांना असेही आढळून आले की, ४१ पदार्थांच्या नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कार्सिनोजेनिक घटक आढळले आहेत. यामुळे कर्करोगासह गंभीर आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त १८ नमुने शिळे, अन्यथा दूषित असल्यामुळे खाण्यासाठी ते अयोग्य मानले गेले आहेत.
कर्नाटकचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के. यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, "आम्हाला राज्यभरात दिल्या जाणाऱ्या पाणीपुरीच्या गुणवत्तेबद्दल अनेक तक्रारी मिळाल्या. आमच्या तपासणीत रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांपासून ते उच्चस्तरीय आस्थापनांपर्यंत व्यापक समस्या समोर आढळल्या आहेत." त्यामुळे अन्न सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. हानिकारक पदार्थ ओळखण्यासाठी आम्ही तपासणी सुरू ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.