नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जगभरात दिवसागणीक कॅन्सरचा धोका वाढत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या 25 वर्षांत कॅन्सरमुळे होणार्या मृत्यूंची संख्या तब्बल 75 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती ‘लॅन्सेट’च्या नव्या अभ्यासातून समोर आली आहे. 2050 पर्यंत जगभरात सुमारे 18 कोटींहून अधिक मृत्यू आणि 30 कोटींहून अधिक नवे कॅन्सर रुग्ण असतील. तसेच, भारतात 1990 ते 2023 दरम्यान कॅन्सरचा प्रादुर्भाव 26.4 टक्क्यांनी वाढला असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
भारतात कॅन्सरचा वाढता धोका व मृत्यू दर जास्त असला, तरी तो जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. 1990 मध्ये भारतातील दर 1 लाख लोकसंख्येमागे 84.8 कॅन्सर रुग्ण होते, तर 2023 मध्ये हा दर 107.2 झाला. म्हणजेच 2023 मध्ये देशात सुमारे 15 लाख कॅन्सर रुग्ण आढळले. 1990 मध्ये मृत्यू दर 71.7 टक्के होता, जो 2023 मध्ये 86.9 झाला असून, त्यामुळे तब्बल 12.1 लाख मृत्यू झाले आहेत.
गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक वाढण्याचा धोका आहे. चीनमध्ये 1990 ते 2023 या काळात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत 18.5 टक्क्यांनी घट झाली आहे. या अहवालात असेही नमूद करण्यात आले की, 1990 ते 2023 या कालावधीत जगभरात एकूण मृत्यू दर 24 टक्क्यांनी घटला असला, तरी गरीब देशांमध्ये नवीन कॅन्सर रुग्णांचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले, तर निम्न-मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये हा दर 29 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
जगभरात नवे कॅन्सर रुग्ण : 30.5 दशलक्ष
1990-2023 दरम्यान भारतात वाढ : 26.4 टक्के
चीनमध्ये त्याच काळात घट : 18.5 टक्के
भारतातील नवे रुग्ण (2023) : 15 लाख
भारतातील मृत्यू (2023) : 12.1 लाख
1990 मध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 84.8 कॅन्सरग्रस्त
2023 मध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 107.2 कॅन्सरग्रस्त
मृत्यू दर 1990 : 1 लाख लोकसंख्येमागे 71.7
मृत्यू दर 2023 : 1 लाख लोकसंख्येमागे 86.9
संशोधकांच्या मते, कॅन्सरमुळे होणार्या मृत्यूंपैकी 40 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे जीवनशैलीत व व्यसने सोडल्यास रोखता येऊ शकतात. तंबाखूचे सेवन, अयोग्य आहारपद्धती, वाढलेले रक्तातील साखरेचे प्रमाण कॅन्सरसाठी अधिक घातक आहे. या धोक्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण केली, तर कॅन्सरमुळे होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात.