पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.६) १० वा दिवस आहे. दरम्यान, राज्यसभा सभागृहाच्या नियमित तपासणीवेळी काँग्रेस खासदाराच्या आसनावर चलनी नोटांचे बंडल सापडले आहे. यामुळे संसदेत खळबळ उडाली. या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या विषयी अधिक माहिती देताना राज्यसभा सभापती जयदीप धनखड म्हणाले, "मी सभागृहातील सर्व सदस्यांना कळवत आहे की, गुरूवारी (दि.६) सभागृह तहकूब झाल्यानंतर सभागृहाची नियमित सुरक्षा पथकाकडून तपासणी सुरू होती. यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांना आसन क्रमांक २२२ वरून चलनी नोटांचा एक बंडल जप्त केला आहे. जे आसन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आले आहे. ते तेलंगणामधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. ही बाब सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली. तसेच मी पुढील तापासासाठी आदेश दिले आहेत". धनखड यांनी सभागृहात केलेल्या दाव्यामुळे काँग्रेस खासदारांनी विरोध केला, मल्लिकार्जुन खर्गे यांनी तपासापूर्वी नावे घेऊ नयेत यावर जोर दिला.
अभिषेक मनू सिंघवी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. "मी राज्यसभेत जाताना फक्त 500 रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी 1 वाजता सभागृह उगवले. त्यानंतर, मी दुपारी 1.30 पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत आणि संसदेतून बाहेर पडलो,” असे ज्येष्ठ वकील म्हणाले.
मात्र, सिंघवी यांनी या घटनेच्या चौकशीचे स्वागत केले. "याचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक सीट असणे आवश्यक आहे जिथे सीट स्वतःच लॉक केली जाऊ शकते आणि किल्ली खासदार घरी घेऊन जाऊ शकते, कारण प्रत्येकजण नंतर सीटवर गोष्टी करू शकतो आणि असे आरोप करू शकतो," असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मात्र आसन क्रमांक आणि खासदाराचे नाव दाखवण्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगितले. "त्यात काय चूक आहे? नोटांचे बंडल संसदेत घेऊन जाणे योग्य आहे का ? याची योग्य चौकशी झाली पाहिजे," असे ते म्हणाले. भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही या मागणीसाठी प्रतिध्वनी केला. ही अत्यंत गंभीर घटना आहे. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे, असे ते म्हणाले.
या घटनेचे पडसाद संसद सभागृहात देखील उमटले. दरम्यान सत्ताधारी सरकार आणि आणि विरोधी पक्षांमध्ये या मुद्द्यावरून खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "भाजप सभागृहात कशाप्रकारे व्यत्यय आणत आहे, हि गोष्ट पाहून घृणास्पद वाटत आहे. भाजप खासदारांना संसद चालवायची नाही म्हणून कशाची भीती दाखवली जात आहे? मंत्री हे एका उद्योगपतीचे रक्षणकर्ते आहेत. लोकांचे प्रश्न इतके अप्रासंगिक आहेत का?", असा सवाल देखील चतुर्वेदी यांनी केला आहे.