पुढारी ऑनलाईन डेस्क : Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्गीय आणि नोकरदारांवर देवी लक्ष्मीची कृपा झाली आहे. सीतारामन यांनी शेतकरी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. करपात्र उत्पन्न मर्यादा १२ लाखापर्यंत वाढवल्याने नोकरदारांसाठी ही मोठी भेट आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, अशी मोठी घोषणा केली आहे.
एलईडी टीव्ही आणि स्मार्ट टीव्ही महाग होतील.
मोबाईल फोन स्वस्त होतील.
ईव्ही देखील स्वस्त होतील.
कर्करोगाची औषधे स्वस्त होतील.
३६ जीवनरक्षक औषधे स्वस्त होतील.
भारतात बनवलेले कपडे स्वस्त होतील.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, डिजिटल शिक्षण संसाधनांची चांगली उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. कर्करोग आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी असलेल्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली जात असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, सरकार एक नवीन कर विधेयक आणेल. हे विधेयक पुढील आठवड्यात मांडले जाईल.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारत खेळण्यांचे जागतिक केंद्र बनेल. यासाठी एक योजना सुरू केली जाईल, ज्यामध्ये क्लस्टर्सद्वारे अद्वितीय आणि शाश्वत खेळणी बनवली जातील.
लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी २० कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.
सीतारामन यांनी सांगितले की, भारताच्या चप्पल आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी मदत करण्याव्यतिरिक्त, चामड्याशिवाय बनवलेल्या चप्पलांसाठी योजना तयार केली आहे. यातून २२ लाख नोकऱ्या आणि ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल तसेच १.१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात अपेक्षित आहे.
पुढील ६ वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित.
कापसाचे उत्पादन वाढवण्याचे ५ वर्षांचे ध्येय, यामुळे देशाचा कापड व्यवसाय मजबूत होईल.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.
लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, इंडिया पोस्टमध्ये परिवर्तन केले जाईल. आमचे सरकार एनसीडीसीला मदत करेल. एमएसएमई हे विकासाचे दुसरे इंजिन आहे. देशातील ५.७ कोटी लोक या क्षेत्रात रोजगार मिळवतात. निर्यातीत एमएसएमईचा वाटा ४५ टक्के आहे. आम्ही एमएसएमईंना पुरेसे भांडवल पुरवणार आहोत.
मत्स्य उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आम्ही मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना राबवणार आहोत. तसेच कापसाच्या उत्पादकतेसाठी ५ वर्षांची योजना बनवून काम करणार आहोत.
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, मखाना बोर्ड स्थापन केले जाईल. बिहारच्या लोकांना याचा अधिक फायदा होईल. मखाना शेतकऱ्यांची स्थिती सुधारणे तसेच मखानाचे उत्पादन आणि विपणन करणे हे त्याचे उद्दिष्ट असेल. बिहारमध्ये एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेला जेडीयूचे सरकार आहे. या वर्षी बिहारमध्येही विधानसभा निवडणुका आहेत. या संदर्भात, ही एक मोठी घोषणा आहे.
२०२५ चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार फळे आणि भाज्यांसाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू करणार आहे. आम्ही उत्पादन वाढवण्यावर तसेच पुरवठा साखळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकारचे लक्ष ग्रामीण तरुण आणि लहान शेतकऱ्यांवर आहे. आमचे सरकार १०० जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करेल. राज्यांच्या सहकार्याने कृषी क्षेत्राचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
सरकार डाळींमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी ६ वर्षांचे अभियान लाँच करू, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. यात तूर आणि मसूर डाळीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. शेतकऱ्यांना आधार आणि हमी खरेदीची खात्री देणारा हा उपक्रम पुढील चार वर्षे चालेल, असेही त्या म्हणाल्या.
"आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढत आहे. गेल्या १० वर्षांतील विकास आणि संरचनात्मक सुधारणांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या काळात भारताच्या क्षमता आणि क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. आम्ही पुढील ५ वर्षे सर्व प्रदेशांच्या संतुलित विकासाला चालना देणारी 'सबका विकास' साकारण्याची एक अनोखी संधी म्हणून पाहू."
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आमचे लक्ष कृषी, लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) आणि निर्यात यासह विकासाच्या ४ इंजिनांवर आहे. शेती हे आपल्यासाठी पहिले इंजिन आहे. यासाठी पंतप्रधान धनधान्य योजनेचा विस्तार केला जाईल. पीक विविधीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे कृषी उत्पादकता वाढेल, ज्याचा फायदा ७.५ कोटी शेतकऱ्यांना होईल.
निर्मला सीतारामन यांचे हे विक्रमी ८ वे अर्थसंकल्प आहे. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूच राहतील. आपली अर्थव्यवस्था ही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष 'ज्ञान' वर आहे. १० वर्षांत आपण बहुआयामी विकास साधला आहे.
आम्हाला अर्थसंकल्पाकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. सरकार मध्यमवर्गासाठी काय करते ते पाहूया, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी अर्थसंकल्पाबद्दल दिली.
संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाले आहे.
संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी, या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी दिली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जी साडी घातली आहे ती त्यांना पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी (२०२१) यांनी भेट दिली होती. दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पाच्या दिवशी ही साडी नेसण्याची विनंती केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
आज संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, सकाळी १०.२५ वाजता संसदेत मंत्रिमंडळाची बैठक होईल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. दरम्यान, अर्थसंकल्पाची प्रत संसद भवनात पोहोचली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. त्या ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील.
मोदी सरकारच्या ऐतिहासिक तिसर्या कार्यकाळातील आगामी अर्थसंकल्प हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने सर्वसमावेशक विकास, रोजगारनिर्मिती आणि दीर्घकालीन स्थैर्य यावर भर देताना तत्काळ समस्यांवर उपाय शोधणे अत्यावश्यक आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 हा महागाई, बेरोजगारी आणि मंदीने ग्रासलेल्या जागतिक परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची सुवर्णसंधी आहे.