पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही मतदान का केलं नाही? तुमच्या मताधिकाराचा वापर करणे तुम्हाला योग्य वाटले नाही का. तुमच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतीमा मलीन झाली आहे. याबाबत दोन दिवसांमध्ये खुलासा करावा, अशी नोटीस भाजपने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना बजावली आहे. जयंत सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. त्यांनी सोमवारी पाचव्या टप्प्यात मतदानादरम्यान हजारीबागमध्ये मतदान केले नाही. तसेच त्यांनी भाजपचे हजारीबाग लोकसभा मतदासंघाचे उमेदवार मनीष जयस्वाल यांच्याच्या प्रचारातही सहभाग घेतला नव्हता.
जयंत सिन्हा यांना भाजपचे झारखंडचे सरचिटणीस आदित्य साहू नोटीस बजावली आहे. यामध्ये म्हटले आहे की,"तुमच्या मताधिकाराचा वापर करणे तुम्हाला योग्य वाटले नाही. तुमच्या वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे," त्यांनी याबाबत दोन दिवसांमध्ये खुलासा करावा, असेही या नोटीस म्हटले आहे.
मार्च २०२४ मध्येच जयंत सिन्हा यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीच्या राजकारणातून मला मुक्त करा, अशी विनंती त्यांनी भाजप नेतृत्त्वाकडे केली होती.
जयंत सिन्हा यांचे पुत्र आशिष सिन्हा हे झारखंडमधील बार्ही येथे इंडिया आघाडीच्या निवडणूक प्रचार सभेत सहभागी झाले हाते. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या वेळी आशिष सिन्हा यांनी काँग्रेसचे उमेदवार जेपी पटेल यांना पाठिंबा जाहीर केला होता.
जयंत सिन्हा यांचे वडील यशवंत सिन्हा यांनी १९९८ पासून सलग २६ वर्ष हजारीबाग मतदारसंघात खासदार होते. यानंतर सलग दोनवेळा त्यांचे पूत्र जयंत सिन्हा हे खासदार राहिले. मात्र मार्च महिन्यात त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत भारत आणि जगभरातील हवामान बदल या विषयावरील कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आर्थिक आणि प्रशासन मुद्द्यांवर भाजपसोबतच काम करत राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते.