नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गंगा, कोसी, गंडक, बूढी गंडक, पुनपुन आणि बागमती या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. १२ जिल्ह्यांमधील सुमारे २२.४२ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत.
काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी
बरेलीत अग्निशमन केंद्रात तीन फूट पाणी
अनेक राज्यांत जनजीवन विस्कळीत
बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. रिंग बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने सुलतानगंज परिसरातील चार हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. दियारा भागात नदीचे पाणी वेगाने वाढत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. पाटणा जिल्ह्यात पालीगंज परिसरात पुनपुन नदीची पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पिथौरागढ जिल्ह्यात पंचाचुली, हरदेवल, नंदादेवी आणि नंदाकोट या उंच पर्वतरांगांवर हलकी बर्फवृष्टी झाली. काश्मीरमधील हिमवृष्टीनंतर उत्तराखंडात चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ आणि हेमकुंड परिसरातील उंच शिखरांवरही बर्फवृष्टी झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे या भागातील तापमानात घट झाली आहे. केदारनाथ पायी मार्गावर चीरबासा परिसरात डोंगरावरून दगड कोसळल्याने ६० वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम आहे. बरेलीमध्ये रविवार दुपारपासून पाऊस सुरू असून, शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. येथील अग्निशमन केंद्रात तब्बल तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आहे.
मध्य प्रदेशात काही धरणांचा विसर्ग सुरू आहे. पुरामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुरैना जिल्ह्यात पाण्यात बुडालेला पूल पार करण्यासाठी नागरिकांना दोरी आणि उपलब्ध स्थानिक साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बडी सादडी शहरात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.