पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना आज (दि.२६) सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. पक्षाने राज्यात 'एक व्यक्ती, एक पद' धोरण राबवल्याने भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. आता आज सायंकाळी जयस्वाल यांच्या जागी भाजपमधील कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बिहार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी अचानक नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर आज बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, ते 'एक व्यक्ती, एक पद' या सूत्रानुसार संघटनेसाठी काम करतील आणि मंत्रिमंडळातून राजीनामा देतील. यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी हवेत वेगाने पसरली. काही वेळातच जयस्वाल यांचा राजीनामाही राजभवनात गेला. राजभवनात मिळालेल्या राजीनाम्यांसोबतच मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांच्या शपथविधीसाठी राज्यपालांकडून वेळ मागण्यात आली आहे.
दिलीप जयस्वाल यांच्या राजीनाम्यानंतर, सरकार मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना स्थान देणार का, असा सवालही केला जात आहे. त्याचबरोबर ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत त्यांच्यामध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये बिहार भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून जयस्वाल यांच्या राजीनाम्याची वाट पाहत होते कारण पक्षात फक्त एकच व्यक्ती एक मोठे पद भूषवू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, यावेळी नितीश सरकारमध्ये पाच ते सहा नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. या विस्तारात भाजप कोट्यातून तीन ते चार आणि जनता दल संयुक्त (जेडीयू) कोट्यातून एक ते दोन जणांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते. दरम्यान, जितन राम मांझी यांचा पक्षही आणखी एका मंत्रिपदाची मागणी करत आहे. या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात जातीय समीकरणांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.