नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2024) बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये औद्योगिक विकास, रस्ते बांधणीसाठी अर्थसंकल्पातून २६ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. तर आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीच्या उभारणीसाठी केंद्राने १५ हजार कोटींची तरतूद केली.
रालोआ सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांची भूमिका महत्वाची आहे. त्यानुसारच केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात त्यांच्या राज्यांनाही विशेष योजनांचा लाभ मिळाला आहे. बिहारमध्ये पाटणा-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी २६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींची तरतूद केली आहे. मागच्या १० वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश या राज्याला अर्थसंकल्पात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमच्या सरकारने मोठे प्रयत्न केले आहेत. या राज्याची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष आर्थिक मदतीची तरतूद करत आहोत. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चालू आर्थिक वर्षात १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून अतिरिक्त निधी पुढील काही वर्षांत दिला जाईल, असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.