Dhar Bhojshala case:
भोपाळ: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा संकुलाबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक ऐतिहासिक निकाल दिला. "भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर असून या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक दस्तऐवज आणि पुरावे लक्षात घेता, या जागेवरील हिंदूंच्या पूजेचा हक्क कधीही संपुष्टात आलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, "ऐतिहासिक साहित्य आणि कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की, वादग्रस्त जागा ही परमार राजवंशातील राजा भोज यांच्या काळातील भोजशाळा असून, ते संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. राजा भोज यांच्या काळातील साहित्यिक आणि वास्तुकलेचे संदर्भ या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर अस्तित्वात असल्याचे दर्शवतात."
ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असलेल्या वास्तूंचे जतन करणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
हिंदू पक्षाच्या मते, धार जिल्ह्यातील हे भोजशाळा संकुल म्हणजे देवी वाग्देवीचे मंदिर आहे. तर दुसरीकडे, मुस्लिम बांधव या जागेला 'कमल मौला मशीद' मानतात. २००३ मध्ये झालेल्या एका करारानुसार, येथे हिंदूंना दर मंगळवारी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पूजा करण्याची, तर मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
न्यायालयाने केंद्र सरकार आणि पुरातत्व विभागाला भोजशाळा परिसराचे व्यवस्थापन आणि संस्कृत शिक्षणाशी संबंधित पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच या परिसराचे संपूर्ण प्रशासन आणि व्यवस्थापन यापुढेही पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली राहील. मुस्लिम पक्षाला नमाज पठणासाठी धार जिल्ह्यात अन्य ठिकाणी स्वतंत्र जमिनीसाठी सरकारकडे दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. भाविकांसाठी मूलभूत सुविधा पुरवणे आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे ही पूर्णतः सरकारची जबाबदारी असेल, असेही न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाच्या या निकालानंतर धार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. धारचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीना यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.