Bengaluru News:
बंगळूर: एका ज्योतिषाने वर्तवलेल्या अशुभ भविष्यामुळे मानसिक दडपणाखाली आलेल्या २७ वर्षीय इंजिनिअर तरुणीने गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर दोन वर्षांत पती-पत्नीमध्ये मतभेद होऊन विभक्त होण्याची शक्यता असल्याचे एका ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणीमुळे ती मानसिक तणावात होती. ही घटना शुक्रवारी बंगळूरच्या एमईआय लेआउट, बागलागुंटे परिसरात घडली.
विद्याज्योती असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, विद्याज्योतीचे दुसऱ्या जातीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिच्या इच्छेनुसार दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला संमतीही दिली होती.
लग्नापूर्वी तिच्या पालकांनी एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. त्या ज्योतिषाने लग्नानंतर दोन वर्षांनी पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्यातून विभक्त होण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली होती. ही संभाव्य अडचण टाळण्यासाठी नऊ दिवसांचा धार्मिक विधी करण्याचा सल्लाही ज्योतिषाने दिला होता. त्यानुसार कुटुंबीयांनी नऊ दिवसांचा विधी सुरू केला होता. कुटुंबीयांनी हा विधी सुरू केला होता. मात्र, पूजेच्या शेवटच्या नवव्या दिवशी आई-वडील घरी नसताना विद्याज्योतीने आपल्या खोलीतील छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला.
संध्याकाळी बराच वेळ खोलीचा दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या वडिलांनी दरवाजा तोडला असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बागलकुंटे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.